काही दिवसांपुर्वी कै. गोपाळ नाईक चौकाच्या नवीन फलकाच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला. फलकाचा अनावरण शुभारंभ अपेक्षेपेक्षाही चांगला झाला. ढोलताशे आणि फटाक्याची आतषबाजी डोळे दिपून टाकणारी. श्वसुरांच्या ऋणातून थोडंफार उतराई होण्यासाठी सुनेने घडून आणलेला योग. खरंतर त्यांचे डोंगराइतके ॠण.... त्यातून कधीही आपण मुक्त होऊ शकत नाही. त्याचे पांगही फेडू शकत नाही. किंबहुना आपण ते फेडले असेही म्हणू शकत नाही आणि म्हणूही नये. ज्यांच्यामुळे आपल्या नाजूक पावलांना पंख फुटले. आकाशी झेप घेण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस स्वप्नं पाहिली त्या पित्याचे.. श्वसुराचे एका मोठ्या चौकाला नांव फार पूर्वीच दिले होते. तो चौक नाही..... पंचकोन आहे . मुंबई नगरी मध्ये असे रस्ते क्वचितच. काही ठराविक ठिकाणी दिसून येईल उदाहरणार्थ मेट्रो सिनेमाच्या समोरील वासुदेव बळवंत चौक....श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ! जेथे पंचकोन आहे तेथे भल्याभल्या महापुरुषांची नांवे दिली आहेत. एका साध्या, सज्जन माणसाला तत्कालीन *नगरसेविका कामिनी मयेकर* यांनी महापुरुषांच्या पंक्तीत बसविलेले पाहून आनंद वाटला. *पण या ठिकाणी आयोजनकर्त्यांनी लावलेली नावाची पाटी त्यांच्या लौकिकाला साजेशी नाही.* कोठेही उभे राहून पाहिले तर तीपाटी.. तो चौक झळाळुन दिसावयास हवी. महापालिका किंवा आपण चौकाला ज्यांचे नांव देतो त्याच्या कार्याचा उल्लेख मात्र केला जात नाही. काय केले त्यांनी समाजासाठी. त्याची ओळख भविष्यातला पिढीला कशी होणार ...? फोर्ट भागात खादी ग्रामोद्योग समोर *गनबो स्ट्रीट* होती. गनबो म्हणजे कोणी इंग्रज नव्हता. पण मुंबई महापालिकेत कुणालाही ठाऊक नव्हते हा गनबो कोण ? त्या स्ट्रीटचे नांव बदलण्यात आले. हा *गणबो म्हणजे नाना शंकरशेठचे आजोबा.* गणाभाऊ हे नांव. पण इंग्रजांनी बोलताना गणाभाऊ बोलण्याऐवजी गनाभो.. गनाभौ असा उल्लेख झाला. काही काळानंतर गनबो झाले. मुंबई वसविण्यासाठी ज्यांचे अमूल्य योगदान आहे त्या नाना शंकर शेठच्या आजोबांचे आजच्या सुजाण लोकप्रतिनिधी पिढीकडून झालेले अवमूल्यन.
गोपाळ नाईक यांचेविषयी आज मागे वळून त्यांच्या कार्याचा आढावा घेताना...... माणुसकीच्या प्रेमाचा प्रेमळ झरा. छानश्या काळजात प्रेम ठेवावे. अन सदैव घरटे बांधून माणसाच्या हृदयात स्थान मिळविणारा एक कार्यकर्ता फेरबंदर भागात नरसू मिलच्या सभोवताली दिसत असे. त्यांची सतत चाललेली चळवळ विभागाला दिसून आली. कामगारांच्या मनात ठसली. सामाजिक परिवर्तनासाठी झगडलेला एक निस्पृह कार्यकर्ता..... कामगारांच्या भल्यासाठी तीव्र संवेदेनेने भारावलेला कार्यकर्ता....दु:खितांच्या प्रश्नावर घायाळ होणारा कार्यकर्ता.... प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करीत प्रापंचिक दु:खे भोगत समाजाच्या चोखाळललेल्या वाटेवरचा वाटसरू म्हणून पुढे जाताना विविधांगी प्रतिभेने केवळ फेरबंदर भागातच नव्हे तर सभोवतालच्या परिसरात आपल्या श्रमजीवी कार्याचा ठसा उमटविणारे कै. गोपाळ नाईक म्हणजे माणसात रमणारा माणूस. त्यांच्याकडे असलेला सोशिकपणा तसंच आलेली जबाबदारी हसतहसत झेलण्याची हातोटी हे गुण अंगी.
*गोपाळ नाईक, यशवंत नागवेकर, बि के आंब्रे* या त्रयींची दोस्ती संस्मरणीय ठरावी अशी होती. फेरबंदर,घोडपदेव या गिरणी कामगारवस्तीतले नरसू मिलचे सुभेदार. या त्रयींचे विचार वेगळे. गोपाळ नाईक हे मूळ डांगेविचारी म्हणजे कॉम्रेड अर्थात लढवय्या. निष्ठा आणि कामावरील समर्पित वृत्ती, उत्तम तेच करण्याचा ध्यास. राजकारणी प्रसिद्धीसाठी जो झगमगाट देतात,तो क्षणभंगुर असतो.पण गोपाळ नाईक जितके जीवनमान जगले तेश्रमिकांचे आयुष्य फुलविण्यासाठी, जेणेकरून हा श्रमजीवी समाज सन्मानाचे जीवन जगेल. अशी माणसं जेव्हा बाजूला जातात किंवा आजारी पडतात तेव्हा त्यांचे व्यवहार, भागदौड अर्थात कार्य थंडावते. ती उणीव मनाला चटके देणारी हुरहूर लावणारी ठरते.त्यांची अखेरची काही वर्षे आजारात गेली. आम्ही अधून मधून त्यांना पहायला जात होतो. आयुष्यभर केलेल्या धावपळीने थकले होते. थोरल्या चिरंजीवाची सेवा सुरु असे. त्यांची सेवा पाहिली अन अभिमानाने ऊर भरून यायचे. त्यांच्या डोळ्यातून पुत्रासाठी ॠणनिर्देश दिसत,सदगदित होऊन पाहत, पण पितृप्रेमापुढे थिटे होते सारे. त्यांच्या पत्नीविषयी .. (आम्ही त्यांना प्रेमाने आई म्हणतो) अंत:करणातला हळवा कोपरा प्रेमाने ओथंबून वाहणारा त्यांचा चेहरा आणि पाणावलेल्या डोळ्यातली ती नजर पाहूनती भावूकता दिसून येई. अन एकेदिवशी श्रमिकांच्या वस्तीत वाढलेला श्रमिकनेता आपल्या सख्यासोबत्यांना, आप्तस्वकीयांना सोडून अलगद गिरकी घेतफुलपाखरासारखे अवकाशात उडाले ते परत न येण्याकरिता.....! मृत्यू हा अटळ असला तरी समस्तांचा भावनिक आधार हरपला. ते त्यावेळीही समस्तांसाठी वंदनीय होते, आजही वंदनीय आहेत आणि भविष्यात देखील राहतील. त्या चौक फलक अनावरण निमित्ताने आठवणी दाटून आल्या.त्या आपल्यासाठी समर्पित.....!
*अशोक भेके*
No comments:
Post a Comment