Thursday, August 15, 2019

*वामनमुर्ती तुकाराम*

तुकाराम मारणे

माजात वावरणाऱ्या अनेक व्यक्तींशी रेशीमगाठी जुळत गेल्या. रेशमासारख्या मृदू मुलायम सुखद आणि पक्या गाठी इतक्या घट्ट होत गेल्या. अशा अनेक मंडळीनी मला इतके दिले की, त्यांच्या विषयीच्या भावना माझ्या कृतज्ञतेच्या आहेत. कृतज्ञता ही माझ्या शब्दातूनच व्यक्त करू शकतो. प्रवचनाच्या, किर्तनाच्या शेवटी  ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. यासारखे अनेक विठ्ठल ज्ञानेश्वर पंढरीनाथ तुकाराम सोबतीला आले. त्यापैकी मला माझे मित्र *श्री तुकाराम मारणे* यांच्याविषयी काहीतरी लिहावं, हे बरेच दिवस मनात होतं शब्दांना सांगावं, शब्दांना आठवू लागले की, तितक्यात कोणी तरी साद घालावी.बोलवावं, नाहीतर मोबाईलची घंटा घनघन वाजत राहावी. याचमुळे विचारशृंखला भंगत गेली आणि तुकाराम लिहिण्याचे राहून गेले. आज लिहायला घेतले खरे, पण तितक्यात आमचा एक मित्र कोलमडला.’उद्या सकाळी लवकर लग्नाला जायचं आहे ना...!, मग लवकर झोप’ त्याला जाऊन दिले आन पुन्हा एकदा आपले बस्तान ठोकले. आज तुकाराम पूर्णत्वास न्यायचाच. निर्धार केला. *तुकाराम मारणे* हा आमचा मित्र.


*तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा*
*काय महिमा वर्णूं त्याची*


पुण्यातल्या उंबरडे,आंबेगाव येथे १५.१२.१९५५ रोजी जन्म झालेल्या तदनंतरचे आयुष्य  मुंबईवासीय होऊन मारुती माळी चाळीत राहणारा. अत्यंत भाबडा, श्रद्धाळू,देवभोळा, सीधासाधा निर्मळ  स्वभावाची ठायी ठायी प्रचीती येते.देवघरातल्या समईसारख्या शांत स्वभावाचा.कुणी केलेल्या उपकाराचे सदैव स्मरण करणारा, फुकटेपणा करण्याची, अथवा बळकावण्याची वृती अजिबात नाही. एकवेळ खिश्यातले देईल पण कुणाच्या पांच पैश्याला मिंधा नाही.दूरदर्शनवरच्या मालिकेतल्या तुझ्यात जिंव गुंतला मधल्या राणासारखा...! वरून जरी साधा माणूस असली तरी यांच्यातला खळखळणारा लाव्हा क्वचितच कुणाच्या तरी निदर्शनास आला असेल. आचरणानेच काय,विचाराने देखील सत्प्रवृत्त, कुणाची निंदा नाही, कुणाविषयी वाईट चिंतने नाही. मदत करण्याच्या बाबतीत *तुकारामाचा आदर्श* हातिमताईचा....! नेकी कर, पाणी में डाल या तत्वांचा. मनापसून द्यायचे अन स्वाहा: करायचे.या माणसाचे मनोविश्लेषण खोलवर जाणताना भावनांचे आणि संवेदनाचे पदर वेगवेगळे करून पाहिले तर या ईश्वराने सुखी माणसाचा सदरा देताना काहीच हयगय केली नाही. कधीही न भेटायला येणारा माणूस जर आपल्या भेटीस आला तर साधारणपणे आपण आज कशी काय वाट चुकलात....! किंवा आमची आठवण कशी काय झाली, असे तिरक्या शब्दांचे शेले भेटताक्षणी हाणीत असतो. पण तुकाराम मात्र ‘अलभ्य लाभ...आज भेटीचा योग जुळून आला म्हणून आपण अवतरलात, असे मी समजतो.’ तिरकस बोलण्याने आनंद नासून जातो. समोरच्याच्या मनात आकस निर्माण होतो. हे घडू नये म्हणून त्यांचे स्नेह, औदार्य दर्शन प्रसन्न करते. वाद होतील किंवा जे पटत नाही त्याच्यापासून दूर राहणेच सदासर्वदा पसंत करतात.कुणीही माणूस आजारी पडला की, त्या आजऱ्याचे आसू स्वस्थ बसू देत नाही.पहिले अस्वस्थपण या माणसात जाणवते. हृदयाची स्पंदने धडधडू लागतात. मातीचे मुके कढ जसे मातीला कळते तसे आजाऱ्याला आधार कसा द्यायचा हे तुकारामकडून शिकावे.त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी सर्वथा असते. अनेक जणांना अनुभव आहे. रात्री बेरात्री कधीही *अण्णा*  हाक मारली तर धावत जाई. आजारीमाणूस देखील आता पुढची चिंता नाही, म्हणून सोन्यासारखा आपला जिंव स्वाधीन करून मोकळे होतात. आश्वासक स्वर त्यांच्या अन्त:करणात घुमला जातो. जनसामान्यांच्या सुख-दु:खात सरळ सोप्या अर्थपूर्णबाबीसह समरस होणारा माणूस.तुकारामच्या आयुष्यात काळे पांढरे रंगी बेरंगी ढग आले आणि गेले....! आभाळ मात्र तेथेच राहिले. स्थितप्रज्ञ निष्ठावंत शिवसैनिक,मोलाची पदवी ग्रहण करून गर्दीत राहण्यापेक्षा मागे उभे राहून अतोनात कष्ट करणारा माणूस. शिवसेना म्हणजे त्यांचा जिंव की, प्राण. पक्षासाठी एकजींव झालेला माणूस. चार्ली चॅप्लीनसारखा तुरु तुरु चालणारा.पायाला भिंगरी लावल्यागत धावपळ करणारा. साधा पेहराव, शिडशिडीत बांधा म्हणजे मूर्ती लहान म्हटले की वामनमुर्ती हे संबोधन आलेच. माणूस आभाळासारखा उंचीचे मोजमाप करू नये पण वामनमुर्ती म्हणून संबोधने गैर नाही. या माणसाचा खरा स्वभावाचा प्रभाव आम्ही *बायांनो नवरे सांभाळा* हा प्रयोग नाट्यगृहात लावला तेव्हा मनावर बिंबला. त्याचा संसार समृध्द आहे, समाधानी आहे.सहचारीणी संगीतावहिनींची समाजसेवेची आवड सोबत त्यांनी स्वत:च्या प्रकाशाचा विचार न करता एकमेकांची सावली बनून राहणं, पसंत केले आहे. हळदी कुंकुवाची साथ एकमेकांची. कितीही म्हटले एकमेकांना अलौकिक, असामान्य तरीही राजकारणात उच्चपदी असून देखील समाजासाठी जमिनीवर पाय रोवून काम करणारी जोडी म्हणून कौतुक तर त्यांचं करायला हवं. खरं तर मफतलाल गिरणी बंद झाल्यावर परिस्थिती खालावली होती. पण एकमेकांनी आहे त्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. मिळेल तेथे काम करीत तुकारामने ते संकटमय क्षण कौशल्याने, हळुवारपणे हाताळले. कष्टपूर्वक साध्य करण्याच्या वृत्तीचे कौतुक वाटल्यावाचून राहवत नाही. चेहऱ्यावर विलसणारे ते हास्य, हास्यप्रधान वामनमुर्तीकडे पाहिले तर त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणणे मनाला पटत नाही. वय झाले असले तरी तरुण आहेत. अजून काय लिहावं... लिहायला बसले की सुचत जाते अन आपण रेखाटत राहायचे. त्यापेक्षा आपले थोडक्यावर समाधान मानायला हवे.


अशोक भेके 

माणूस साधा आणि पक्का इरादा


किरण टाकळे
                       
            माणूस हा बोलणारा प्राणी. निर्मळ मनाची माणसं खूप बोलतात.पण अबोल माणसे बोलत नाहीत ती अत्यंत धोकादायक असतात, असे म्हटले जाते. एकवेळ  मुका असला तरी खुणा करून बोलतो. काहीजण रंगरेषाच्या सहाय्याने बोलतात. काही सुरातून, नादातून बोलत असतो. तर आमच्यासारखे क्वचित लेखणीतून बोलत असतो.परंतु आपल्या कर्माच्या सहाय्याने बोलणारा माणूस म्हणजे  *किरण टाकळे.....*  ध्येयापोटी, मायेपोटी समाजावर भाबडे प्रेम करणारा किरण म्हणजे जगण्याचा निव्वळ आनंद घेत आहे. सर्वांच्या उपयोगी पडावे, कोणी बोलावे अथवा न बोलावे, धावून जात पडेल ते काम इच्छा बाळगणाऱ्या किरणचे शब्दचित्र करण्याचा मोह होण्यास कारण असे घडले की, काल मी रस्त्यावरून जात असताना या शनिवारी काय लिहावे मनात विचार सुरु असताना एका इमारतीच्या खाली गर्दीत उभा असलेल्या किरणकडे माझे लक्ष गेले. त्याने देखील पाहिले. गर्दीतही त्याचा हात उंचावला गेला. तेव्हाच मनात आले विषय तर समोरून चालत आला. लहानपणापासून पाहत आलो त्या किरणवर लिहावे असा विचार बहुतेकवेळा मनात आला. परंतु काही ना काही कारणास्तव माझा हेतू साध्य झाला नाही. मध्यंतरी विभागीय ज्येष्ठ महिलांना देवदर्शन करून आणायची योजना आखली होती. साधारणत: सोळा एक बसेसची तयारी करण्याचा चंग बांधला होता. परंतु काही कारणास्तव त्या योजनेवर पाणी पडले. निराश झालेल्या किरणने दुसऱ्या कार्यक्रमाकडे स्वत:ला वळविले. मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचे ठरले. अनेक स्पर्धकांना निमंत्रणे धाडली. महाकाय स्मृतिचषक बनविण्यात आला आणि ऐनवेळी पुलवामा घटना घडली आणि या संकल्पनेला ऐनवेळी रद्दबातल करावे लागले. माणूस करायला इच्छुक असतो पण अडचणी उभ्या राहतात. मनातले हौशीपण धुळीस मिळते. अशा बाबी शब्दामध्ये बध्द करता येत नाही. परंतु ठीक आहे. त्यांना समाजासाठी काही तरी करायचेच आहे तर आज ना उद्या नक्कीच यापेक्षा अधिक उर्जेने करतील. ज्याचे कर्म बोलते ते जर विधायक असेल तर तो खरा समाजसेवी गप्प कधी बसत नाही. अनेक कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात पटाईत असलेल्या किरणला सनई सुरांच्या (सनईचे सूर म्हणजे वरातीचा मूड निर्माण करणारे) कार्यक्रमाची रूपरेषा आखता आली नाही.
            किरण राजू कामाठी चाळीतच मोठा झाला. श्याम टाकळे यांचे ज्येष्ठ पुत्र. वडील देखील समाजसेवी. घोडपदेव नागरी पतसंस्थेवर संचालक म्हणून ह्यात गेली. खरं तर ते वैश्यवाणी असल्याने त्यांचा धंद्याचा पिंड. धंदा करून पाहिला. धंद्यात चांगला जम बसला होता. पण एका जागी खिळून राहणे त्याला जमेल तो किरण कसला...! चळवळया माणसाला एका ठिकाणी बांधून ठेवले तर त्या जागेत भूकंप नक्कीच होऊ शकतो. किरण प्रकाशझोतात येण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे सौ समिता नाईक यांच्या निवडणूक प्रचारार्थ दारूखाना भागातील एकट्याने धुरा सांभाळताना तेथेच कैक दिवस राहिला. तेथेच खाटेवर डुलकी मारीत काही दिवस तेथेच वास्तव्य करीत त्या दाक्षिणात्य माणसांच्या गोतावळ्यात सहभागी झाला. त्यांचा आदर करीत, त्यांना समजावून घेत त्यांच्या चालीरीतींना दाद देत सखा झाला. खिश्यात पैसे नव्हते, पण उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा या न संपणाऱ्या धनाच्या जोरावर दिवस रात्र  पक्षासाठी केलेले काम सर्वांच्या हळूहळू लक्षात आले. या कर्तुत्वाचे मोजमाप केले तर त्यातील गुणाची टक्केवारी निश्चित किती असावी...! हे संबधित किंवा ज्यांना राजकीय विषयाची आवड आहे आणि बारीक सारीक बाबीकडे ज्यांचे लक्ष असते ती मंडळी, राजकारणात किरण किती मुरब्बी आहे यासाठी  नक्कीच १०० गुण अदा करतील.
            आम्ही मंडळी दशक्रीयेला रे रोडच्या स्मशानभूमीत गेलो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. दशक्रिया सभामंडपाच्या सभोवताली शेवाळ झाले होते. येणारे सगेसोयरे त्यादिवशी घसरणीचे शिकार झाले होते. परंतु प्रसंग पाहून कोणी काही बोलले नाही. परंतु आमच्या मनाला हि बाब चटका देऊन गेली. आम्ही घरी आल्याबरोबर सदर शेवाळविषयी वृत्त संबधितांना समजेल असे लिहिले. विश्वास बसत नाही. परंतु या किरणमहाशयांनी त्याच दिवशी पाऊस पडत असताना  रे रोडच्या स्मशानभूमीत जाऊन स्वत: कामगाराकडून सदर जागा स्वच्छ करून घेतली. हे मला त्यांनी सांगितले नाही तर मी सदर बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला आम्ही कालच स्वच्छ केल्याचे सांगितले...! तेव्हा मला कळले. साध्या मनाला बुचकळ्यात ढकलणारा हा  सरळ वळणाचा  आडवळणी विषय अधिकाऱ्यांनी ऐकविला अन त्यांच्या कार्यकर्तेगिरीला खरोखर प्रणाम केला. माणूस साधा पण पक्का इरादा असलेला समाजासाठी जेव्हा तळमळत असेल, अवघ्या समाजाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी जर कळकळ असेल तर त्याच्या कार्याला दाद द्यायला आम्ही मनाचा मोठेपणा दाखवायला हवाच.किरणसारखी माणसं समाजाशी जन्मजन्मांतरीचे नाते समजून आत्मविश्वासाने, सुखानं,अगदी रुची घेत घेत जर काम करीत असतील त्यांना शौकीन म्हणावं की, वखवखलेले म्हणावं....! त्याच्या व्यक्तिमत्वाचे काही विशेष येथे अधोरेलिखित करायला हवे होते. पण वाचकांना अधिक गुऱ्हाळ पसंत नसते आणि लेखनशिष्टतेत योग्य नव्हे. किरणनी स्विकारलेल्या या आनंदी पाऊलवाटेवर त्यांचे सहकारी असतील, सोबती असतील. आपण मात्र त्यांना शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.

अशोक भेके
घोडपदेव समूह


आठवणीतील माणसं : साहेब....!


सहकारतज्ञ कै. सुभाष सखाराम शिंदे 

           


                  खरंच कोणी नसते संगतीला तेव्हा आठवणी हळव्या मनाला स्पर्शून डोळ्यातून ओघळतात. वर्तमानाच्या या वळणावर भूतकाळ कळत नकळत समीप येऊन उभा राहतो आणि आठवणीस हमखास खेटतो. मग आमच्या भावना शब्दातून बोलू लागतात आणि कागदावर खोलू लागतात. निमित्त आहे चौक अनावरण. साहेबांच्या नावाने ज्या कर्मभूमीत ज्यांनी सहकाराचा वटवृक्ष लावला. त्या रस्त्यावर बागडणारे, झोपणारे श्रमजीवी लोकांच्या आणि वर्षानुवर्षे सावकारशाहीच्या मगरमिठीत गुदमरलेल्या गरजू पिडीताना एक विशाल आशेचा किरण देणाऱ्या सहकारतज्ञ कै. सुभाष सखाराम शिंदे यांच्या चौकाचे अनावरण होत असल्याने साहेबांच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलताना त्यांची ती सोज्वळ, मितभाषी चष्म्याच्या आडून डोळ्यात आणि गालात हसणारी त्यांची मूर्ती समोर आली.
                                   श्री सुभाष सखाराम शिंदे...११ नोव्हेंबर १९४० रोजी वडगाव सहानी, जुन्नर, पुणे  येथे शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म झाला. जनमानसात त्यांना साहेब याच विशेषणाने ओळखले जात असे.कारण घोडपदेव मध्ये त्याकाळात पदवीधर होऊन विभागाचे नांव प्रकाशझोतात आणणारे.. पदवीधर होऊन तेथेच न थांबता वकिलीचे शिक्षण घेत  कायदा शास्त्राचे ज्ञान आकलन करीत  घोडपदेव सारख्या गिरणी आणि माथाडी कामगार वस्तीत शंभर चौ. फुटाच्या सुभाषलेनच्या  घरात आपल्या चार लेकरासह जीवन जगणाऱ्या साहेबांनी आपल्या आयुष्याला लोकांसाठी  अर्पित करीत खरं आणि प्रामाणिकपणे जगले. सज्जन म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे पण सज्जन होऊनच या जगाचा निरोप घेताना ती आयुष्याची कमाई शिल्लक राखली ते म्हणजे साहेबांचे नांव. म्हणून तर येत्या काही दिवसातच मोठ्या दिमाखात त्यांचे नाव चौकाला दिले जात आहे. साहेबांनी आयुष्यात काय केले....! हे मी लोकांना सांगणे म्हणजे मूर्खपणाचे ठरेल. विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचा वटवृक्ष साहेबांनी कै. दिनकर पारखे,  कै. हरिभाऊ काचळे  यांच्या मदतीने लावला. उत्तम पायाभरणी केल्यामुळे आज संस्थेचा पसारा वाढत चालला आहे. प्रारंभी फंड या सामुहिक चळवळीतून त्यांनी जिवनावश्यक वस्तू ना नफा ना तोटा तत्वावर वितरीत करताना आपल्या माणसाला नेमका लाभ कसा होईल, याकडे शांत आणि सखोल विचारी मनाने लक्ष दिले. सोबत दावल दफ्तरे, खिल्लारी नावाच्या सद्गृहस्थाने साथ दिली. अर्धागिनी सौ. सुनीताताई शिंदे यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. विशेष म्हणजे ते केंद्र शासनाच्या आयकर विभागात सेवेला असताना त्यांना आयकर निरीक्षक म्हणून बढती मिळालेली असताना आपल्या सामाजिक सेवेत खंड पडेल याकारणास्तव त्यांनी बढती नाकारली. त्यांनी स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता अनेकांना एकत्रित करून सहकाराची गुढी उभारली त्यामुळे गोरगरीबांच्या गरजा पूर्ण होत गेल्या. आपल्या माणसाच्या अडचणी पाहून डोळ्यात अश्रू उभे राहत असत. पण तेच अश्रू न वाळविता मित्र बनून सहाय्यास धावून गेले. अडचणी आल्या मात करीत गेले. यश आले वाटून घेतले. मीपणा न करता साहेबांनी खरोखर आयुष्यात कमावले ते नांव.
                                   साहेबांच्या बाबतीत एक उदाहरण त्यांच्या मुखातुनच ऐकला. ते एस टी ने जुन्नर जात असताना त्यांचे पैश्याचे पाकीट चोराने मारले. तेपण गाडीत बसल्यावर कंडक्टर तिकीट तिकीट करीत आला तेव्हा त्यांच्या लक्षात आले. आता काय करायचे....! कपाळावर घाम जमू लागला. गावी जाणे तर महत्वाचे होते. रात्री अकरा नंतर दुसऱ्यादिवशी सकाळी ९ वाजता गाडी. कंडक्टर साहेबांकडे पाहत उभा होता. त्याच्याही काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. साहेब पाकीट गेले वाटते.....?
साहेबांच्या मनातल्या नेमक्या आणि आवश्यक गोष्टीवर कंडक्टरने नेमके हेरले. तेव्हा कंडक्टर म्हणाला चिंता करू नका. मी तुम्हांला ओळखतो...! मी तिकीट देतो. समाजाच्या भल्यासाठी घोडदौड करणारांना असे लाभ घडतात. कुठेतरी पुण्याई कामाला येते.
                                        साहेबांचा अमृतमहोत्सवी सांगता समीप येत असताना साहेबांना आजाराने ग्रासले. ते बिछान्यावर खिळले. शांत दिसणाऱ्या सागराचे अंत:करण ढवळून निघाले. अखेरीस बदलला खेळ, बदलून गेले सवंगडी. सुन्न आणि खिन्न साहेबांचे मन सागराच्या लाटेत घुटमळत राहिले. नियतीच्या निष्ठुर खेळाला कोणी कधी जाणले नसेल पण साहेबांकडे पाहिले असता कठोर पाषाणाच्या डोळ्यात नियतीने पाणी आणले होते. जोवर जिंव आहे तोपर्यंत समाजासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी लढेन असे सांगत ज्या समाजाच्या मनावर, त्यांच्या हळव्या वेदनेवर औषध कसे लावायचे आणि मात्रा कितीशी वापरायची त्या समाजसेवकाला असे निपचित पडलेले पाहून आभाळ भरून आले होते कडा पाणावल्या होत्या. आणि एक लाट आली आणि.....! कुणाला मरण चुकले नाही. परंतु जाणारांनी चटका देत जाणे, हे सहन होत नाही.  तो दिवस होता ४ ऑगस्ट २०१५. आज चार वर्षे झाली. साहेब गेले असले तरी त्यांचे प्रेरणादायी विचार आजही मागे आहेत. ते सदैव प्रेरणादायी असतील.


अशोक भेके
*घोडपदेव समूह*