परवा दाऊ लिपारे यांनी वेगळ्या वाटेवर प्रयाण केल्याचे म्हणजे
मनसेतून शिवसेनेत दाखल झाल्याचे सोशल मिडीयावर प्रसारित झालेले फोटो पाहून कोणी
अचंबित होण्यासारखेच आहे. या वृत्ताची चर्चा होणारच. त्यात काहींनी केली व्यक्त
हळहळ, त्यात टीकाही होती तर काहींनी केले
स्वागत. दाऊ म्हणजे विजय लिपारे... खास वेगळेपणाने मैत्री जपणारा एक पराकोटीचा
आमचा सुसंस्कृत मित्र. मनसेच्या गोतावळ्यात दाऊला नेहमीच झुकते माप दिले. शिवाय
वरिष्ठ पातळीवर कांकणभर अधिक कौतुकही केले गेले. हे शिवसेनेत देखील घडेल. अती रथी
महारथी ही मंडळी देखील वाऱ्यावर सोडणार नाहीत. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे,
कोणी कुठे जायचे आणि कोठे राहायचे....! संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य आणि
विचार स्वातंत्र्य यानुसार मनमर्जीनुसार आपल्याला कोठेही संचार करता येतो. त्या
संचारात जीवनात वाहणारा आनंदाचा निर्झर कायम राखला पाहिजे. जे जे उत्तम उन्नत उदात्त अपेक्षित असते
ते तेथे मिळेलच असे नाही. पण एक महत्वाचे जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत
नाही. ज्याच्यात हिम्मंत, त्यालाच बाजारात किमंत... किती सुलभतेने आपण म्हणून
जातो. हे राजकीय क्षेत्राशी निगडीत नाही.
पक्षांतर करणारांची हिम्मंत तात्पुरती असते आणि किमंत शून्य होते. जेव्हा आपल्याला
पक्षातील काही गोष्टी पटत नसतील आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या असतील तर आपण शांत
बसलेले बरे....!
*तू यावं, तू जावं*
*मन बंधन तोडीत जावं*
*शिव बंधन बांधीत यावं*
हे समर्थन नाही तर वस्तुस्थितीचे कथन आहे. दाऊने पण त्यांच्या सोबत्यांवर भरभरून प्रेम केले, हे
नाकारता येणार नाही. हे घडायच्या अगोदर म्हणजे पूर्वसंध्येला आम्ही जवळ जवळ अर्धा
तास गप्पा मारल्या. पण त्यांच्या बोलण्यातून असे काय जाणवले नाही. अखेर ज्याचा
त्याचा प्रश्न आहे. पण एक पाहिले की, त्यांनी पांघरलेला मुखवटा न गळून पडण्यासारखा
होता. चेहऱ्यावर न जाणवणारे भाव. चिडचिड नव्हती उद्वेगही नव्हता. रंगमंचावरचा
विदुषक देखील आपल्या बुरख्याआडची छटा लपवू शकत नाही. आपण तर माणसे... एकमेकांचा
चेहरा वाचू शकत नाही, याचा अर्थ असा की, आम्ही म्हणजे एक शून्यासारखी गत झाली. स्वाभिमानी
पण प्रेमळ, क्वचितप्रसंगी बिलंदर ( आता घडलेल्या प्रसंगावरून ) शक्यतो सत्याची कास
धरणारा विजय लिपारे मनाला जाम भिडतो. नगरच्या शेतीत आणि मातीत वाढलेला हा रुबाबदार
आपुलकीबाज व्यक्तिमत्वाशी आम्ही जोडलो गेलो.
मनसेला नवीन नाही. अनेक होते त्यांनीही वेगळ्या वाटा
निवडल्या. जाणारे जात आहेत. त्याचा फरक इतरांच्या मनावर होत नाही, हे विशेष. विशेष
म्हणजे असे काही घडले की मनसैनिक जागे होतात. त्यादिवशी काहीतरी चारशे साडे चारशे
महाराष्ट्र सैनिक माझगाव गडावर पोहचले
होते. अशी जागरूकता असेल आणि अंतर्गत कलहाकडे सुजानतेने दुर्लक्ष केले तर, गेलेली
उभारी पुन्हा मिळविता येईलच. हे स्थानिकांचे म्हणणे रास्त आहे.
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ आहे. चांगली पाने वाट्याला
येणे, हा एक नशिबाचा भाग आहे. पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे हे विजय
लिपारेना कितपत जमतंय....! जमलं तर यश निश्चित आहेच. तरीही आम्हां सृष्टांच्या
शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी आहेत.
त्यांना उतरोत्तर यशोन्नती मिळत राहो आणि त्या वाढत्या
उन्नतीबरोबर अहंकाराचा वारा न लागो...! पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.
*अशोक भेके*
No comments:
Post a Comment